महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) खातेकडून राज्यभरात सामान्य जनतेस एसी लक्झरी बस सुविधा रास्त दरात पुरविण्याचा गाजावाजा करत राज्य शासनाने लागू केली केलेली शिवशाही बस (Shivshahi Bus) पुन्हा एकदा प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने चर्चेत आली आहे. यावेळेस मात्र प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून लोणावळा घाटापासून काही मिनिटांच्या अंतरावर बसचे स्टेरिंग जॉईंट तुटले मात्र लोणावळा फूडमॉलच्या परिसरातच असा प्रकार घडल्याने सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचल्याचा प्रकार घडला आहे.
स्टेअरिंगचे कनेक्शनच तुटले-
याबाबत अधिक माहिती देताना ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा यांनी सांगितले की, ‘मी बाल हक्क आयोगाची सुनावणी संपवून पुण्यात परत येत असताना शिवशाही बसमध्ये प्रवास करत असताना लोणावळ्याच्या फुडमॉलला बस थांबली. पुन्हा काही वेळाने पुण्याकडे प्रवास सुरू झाल्यावर प्रवाशांनी एसीचे तापमान खुप थंड असल्याने ते ड्रायव्हरला वाढविण्यास सांगितले, मात्र ड्रायव्हरने एसीचे तापमान वाढवताना जोरदार आवाज झाला व बसला हादरे बसून बस रस्त्यावर थांबली.’

घाटात अपघात होता वाचला!-
‘त्यानंतर ड्रायव्हरने आम्हाला बसचे स्टेरिंग कनेक्शन तुटले असल्याने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये प्रवास करण्यास सांगितले. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक कालावधीनंतर नॉन एसी बस उपलब्ध करून देण्यात आली व कित्येक प्रवाशांना पुण्यापर्यंत उभ्याने प्रवास करावे लागला. हेच जर घाटात घडले असते तर मोठा अनर्थ झाला असता.’
मुख्यमंत्र्यांना तक्रार अन्यथा कायदेशीर कारवाई-
‘याविरोधात मी व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलला तक्रार केली असून राज्यभरात शिवशाही बसचे होणारे अपघात आणि प्रवाशांच्या जीवितास होणाऱ्या धोक्यास अनुसरून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली असून दोषी अधिकाऱ्यांवर शास्तीची तसेच फौजदारी कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबत राज्य सरकारने नेहमीप्रमाणे कारवाईस चालढकल केल्यास मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे’ असे ही श्री.शर्मा यांनी पुढे सांगितले.